शिक्षकांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार
कोल्हापूर (दि.१६ मार्च) : काल दि.१५ मार्च २०२१ रोजी विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीने पुकारलेल्या आंदोलनाला सोमवारी जयंत आसगावकर व विक्रम काळे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. निधी वितरणामध्ये कोल्हापूर आणि मुंबई यांचा समावेश करण्यासाठी शिक्षणमंत्र्यांकडे पाठवपुरावा करून हा प्रश्न मार्गी काढू, अशी ग्वाही आसगावकर यांनी दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशनातील मंजूर पुरवणी निधीचे शासन निर्णयानुसार उच्च माध्यमिक शाळांना तात्काळ निधी वितरीत करून या शाळेतील शिक्षकांचे पगार बोर्ड परीक्षा २०२१ परिक्षेपूर्वी शिक्षकांच्या खात्यात जमा करावेत, अघोषित माध्यमिक, व उच्च माध्यमिक शाळांना अनुदान तरतुदीसह तात्काळ घोषित करावे यासह विविध मागण्यांसाठी विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभाग येथे सोमवारी आंदोलन करण्यात आले. आसगावकर म्हणाले, कोल्हापूर व मुंबई विभागातील शिक्षकांवर अन्याय झालेला आहे. निधी वितरणामध्ये कोल्हापूर व मुंबई विभागात समावेश व्हावा, यासाठी शिक्षणमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. शिक्षकांना पगार मिळावा, हीच आमची भूमिका आहे, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असून शिक्षण मंत्र्यांच्या संपर्कात आहे. हा प्रश्न निकाली काढण्याबरोबरच यामध्ये चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन आमदार आसगावकर यांनी दिले. शिक्षक आमदार म्हणून तुमच्या पाठीशी सदैव असल्याचे आसगावकर यांनी सांगितले. आमदार काळे यांनी ही शिक्षकांच्या अडचणी समजून घेत आम. आसगावकर आणि मी शिक्षकांचे प्रश्न मागणी मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करत असल्याचे सांगितले. हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी कृती समितीचे विभागीय अध्यक्ष रत्नाकर माळी, खंडेराव जगदाळे, एम.एन.पाटील,विशाल चंदूरकर, पी. वी.जाधव कुंभार सर अडसूळ सर खंडागळे सर चौगुले सर बाजीराव बरके, नंदकुमार पाटील, एस. डी. अजेटराव, संतोष कांबळे, उदय पाटील, के. के. पाटील, पांडुरंग गावडे, मनीषा माळी, वीना पोतदार, सुमन पाटील यांच्यासह शिक्षक-शिक्षका मोठ्या संख्येने उपस्थित होते.



0 टिप्पण्या